पत्नीच्या विरहाने पतीने गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |येथील जारगाव परीसरातील हनुमान नगर येथे राहत असलेल्या पतीसह संसाराचा गाडा ओढणाऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कुणाचाही आधार शिल्लक नसल्याने पतीने चिठ्ठी लिहून घरातच गळफास घेऊन आत्महत्या करुन आपली जीवन यात्रा संपवली.

विवाहा प्रसंगी सात फेरे घेत असतांना सात जन्म सोबत राहण्याचे आश्वासन पाळले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत दांपत्यावर पाचोरा येथील स्मशानभूमीत एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुळचे नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले विष्णू नामदेव पाटील (भामरे) (वय – ६५) हे अनेक वर्षांपासून गवंडी काम करत पत्नीचा व स्व:चा उदरनिर्वाह करीत होते. कालांतराने त्यांचे वय वाढल्याने अंगात काम करण्याची ताकद शिल्लक न राहिल्याने आणि त्यांना मुल बाळ नसल्याने पत्नी किरणबाई विष्णू पाटील ह्या लोकांच्या घरी धुणी भांडी करून पतीचे पालन पोषण करीत असे. दि. २६ मे रोजी थकलेल्या अवस्थेत किरणबाई ह्या दुपारी झोपल्या आणि चार वाजता विष्णू पाटील याने पत्नीला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता त्या मृत अवस्थेत आढळून आल्या. आणि विष्णू पाटील यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे त्यांना खात्री झाल्याने जीवन जगण्याचा आधारच संपल्याने त्यांनी कुणाला काही एक न सांगता पत्नीच्या मृत्यूनंतर काहीच वेळात घराचे छताला दोर आवळून आपली जीवन यात्रा संपविली. विष्णू पाटील हे नगरदेवळा येथील मुळ रहिवासी असल्याने शहरात चांगले काम मिळेल या अपेक्षेने पाचोरा येथे आल्यानंतर हनुमान नगरातील दिगंबर रामदास अहिरे यांचे घरात गेल्या चार वर्षांपासून भाड्याने राहत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता दिगंबर अहिरे यांनी टाकीत पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार सुरू केली टाकी भरल्यानंतर विष्णू पाटील यांना नळ बंद करण्यासाठी आवाज दिला. दोन तीन वेळा आवाज देवूनही विष्णू पाटील बाहेर न आल्याने त्यांचे घरात जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला असता विष्णू पाटील हे गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत तर किरणाबाई अंथरुणावर मयत अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी पोलीसांना कळविले.

*विष्णू पाटील यांनी चिठ्ठी लिहून केली आत्महत्या*
पत्नी किरणबाई हिचे निधन झाल्याने विष्णू पाटील यांना आधार शिल्लक न राहिल्याने त्यांनी जीवन संपविण्याचा विचार केला होता. गळफास घेण्या अगोदर माझी पत्नी मयत झाल्याने मला जीवनात कुणाचाही आधार शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. आमचे अंत्यसंस्कार कुणीतरी करावे, अन्यथा नगरपालिकेच्या लोकांना अंत्यसंस्कार करण्यास सांगावे अशा आशयाची चिठ्ठी पोलीसांना खुर्चीवर आढळून आली. मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मयताचे भाऊ व चुलत भाऊ यांनी पाचोरा येथील स्मशानभूमीत दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार केले.

Protected Content