नैतिकता असेल तर शिंदेंनी राजीनामा द्यावा : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तांतर हे गैरप्रकारे झाल्याचे नमूद केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

 

आज सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्ता संघर्षाबाबत निकाल दिला. यात त्यांनी व्हीप, राज्यपालांचे निर्णय आणि प्रतोद या तीन मुद्यांवरून शिंदे गटाला जोरदार धक्का दिला. राज्यात सत्तांतर चुकीच्या मार्गाने झाले असून राज्यपालांचे सर्व निर्णय चुकल्याचे कोर्टाने सांगितले. तर, शिवसेनेच्या प्रतोदपदी भरत गोगावले हे नव्हे तर सुनील प्रभू हेच असल्याचेही मान्य केले. लक्षणीय बाब म्हणजे व्हीप बजावण्याचा अधिकार हा गटनेत्याचा नव्हे तर पक्षाचा असल्याचेही कोर्टाने मान्य केले. नेमक्या याच बाबीवरून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

 

आज निकाल लागल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष हे सारासार विचाराने आणि संविधानाला स्मरण ठेवून निर्णय घेतील असा आमचा विश्‍वास आहे. राज्यातील शिंदे सरकार हे गैरमार्गाने आल्याचे कोर्टाने सांगितले असून त्यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा असेही संजय राऊत म्हणाले.

Protected Content