नगरसेवक बंटी जोशी यांची गांधीगिरी : सागर पार्कवर केली साफसफाई(व्हिडिओ)

जळगाव, सचिन गोसावी ।  पाच जुलैपासून वारंवार तक्रार करून देखील मनपा प्रशासनाने सागर पार्क येथील ट्रॅकवरील गवत न काढल्याने शिवसेना गटनेते बंटी जोशी यांनी गांधीगिरीकरत  स्वतः गवत काढत मनपा प्रशासनाचा निषेध केला.   

 

नगरसेवक बंटी जोशी यांनी पाच तारखेपासून महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे सागर पार्क येथील ट्रॅक हा संपूर्णपणे गवताने वेढला असल्याचीत तक्रार केली होती. पावसाळ्याचे दिवस आहेत साप, विंचू  या गवतात असण्याची शक्यता व्यक्त करत कोणाला इजा होऊ शकते अशी शंका उपस्थित केली. आज २० दिवस होऊन वारंवार तक्रार करून देखील प्रशासन गवत कापत नसल्याने त्यांनी स्वतः गवत काढून  प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. मनपा सत्तेत शिवसेना  असतांना शिवसेनेच्या गटनेत्यांना गवत काढण्यासाठी आंदोलन का करावे लागत आहे, असा प्रश्न उपस्थित केला असता बंटी जोशी यांनी उत्तर देतांना सांगितले की, मनपा प्रशासन ढिम्म आहे, त्याची सुस्थावलेली चाल असून ती बदलण्याच्या मानसिकतेत नाही.  सत्ताधारी व विरोधक त्यांना आवाज उठवावाच लागतो असे मत व्यक्त केले. प्रशासनाच्या धीमी गतीच्या कारभाराबद्दल त्यांनी सांगितले की,  सागर पार्क येथे चार वर्षांपासून  मंजूर काम आहे. येथील वॉल कंपाऊंड, ट्रॅक, पेव्हर ट्रॅकसाठी झगडावे लागले. आजही लालमातीचा ट्रॅक बाकी आहे. हायमास्टचे पोल मागील ६ महिन्यापासून उभारण्यात आले असून  या पोलवर लाईट लावण्यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा करत आहे मात्र अद्यापही लाईट लागले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मनपा प्रशासन  एकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’ असे आवाहन करत असतांना  याठिकाणी २ लाख ४० हजार रुपये वृक्षारोपणसाठी मंजूर असून  देखील हे काम करण्यात आलेले नसल्याचा आरोप श्री. जोशी यांनी केला.  चार वर्षांपासून ताजमहाल चे काम केल्यासारखे काम करत आहेत. दीड महिन्यात सुप्रीम कंपनीने सुरु केलेले शौचालयचे काम प्रगतीपथावर आहे. प्रशासनाचा विरोध करण्यासाठी आज प्रतिकात्मक स्वरुपात गवत काढले आहे. त्यांनी या आंदोलनानंतरही गवत काढले नाही तर रोज थोडे थोडे गवत काढणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

 

Protected Content