नंदीग्रामची फेरमतमोजणी जिवाच्या भीतीने अधिकाऱ्यांनीच टाळली – ममता

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याने जिवाच्या भीतीने फेरमतमोजणीचे आदेश दिले नाहीत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी येथे केला.

 

नंदीग्राममधील निवडणूक निकालाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे ममता यांनी येथे सांगितले. नंदीग्रामच्या निवडणूक अधिकाऱ्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविलेला एसएमएस या वेळी ममता यांनी जाहीर केला. फेरमतमोजणीचे आदेश दिले तर आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कदाचित आत्महत्याही करावी लागेल, अशी भीती निवडणूक अधिकाऱ्याने एसएमएसद्वारे व्यक्त केल्याचे ममतांनी सांगितले.

 

नंदीग्राममधील निकाल औपचारिकपणे जाहीर करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोग तो कसा रद्द करू शकते, असा सवाल ममतांनी केला आणि त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचा पुनरुच्चार केला. ममता पुढे म्हणाल्या की, मतमोजणीच्या वेळी चार तास सव्‍‌र्हर कसा बंद पडला, जनमताचा कौल स्वीकारण्याची आमची इच्छा आहे, मात्र एका जागेच्या निकालाबाबत विसंगती असल्यास निश्चितच शंकेला वाव आहे, त्यामुळे आम्हाला सत्य जाणून घ्यावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.

 

राज्याच्या काही भागात हिंसाचाराचा उद्रेक झाल्याचे वृत्त आल्याच्या पाश्र्वभूमीवर ममतांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे  आणि चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन केले. निवडणुकीदरम्यान केंद्रीय दलांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आरोप या वेळी ममतांनी केला. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्या पक्षाला ५० जागांचा टप्पा ओलांडणेही कठीण झाले असते, असा आरोपही त्यांनी केला.

 

Protected Content