Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुदैवी घटना : शेतात पाणी देतांना वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंजाळे गावाच्या शिवारात शेतात पाणी देत असतांना अचानक तार तुटल्याने ५७ वर्षीय शेतकऱ्याचा वीजेच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील अंजाळे येथील वासुदेव मार्तंड चौधरी (वय-५७) हे शुक्रवारी १२ मे रोजी सकाळी आपल्या गाव शिवारातील असलेल्या त्यांच्या शेत गट क्रमांक- ५५२ मध्ये केळीच्या बागेत पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी मोटार सुरू केली व शेतात मध्ये गेले असता या ठीकाणी इलेक्ट्रिक खांबावरील तुटलेल्या तारेला धक्का लागल्याने जागीच मरण पावले.

मयत वासुदेव चौधरी यांच्या पत्नी यांनी वारंवार दुपारीच्या वेळेस फोन लावलेत याचे उतर न मिळाल्याने व चौधरी हे उशीरा पर्यंत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी व गावातील ग्रामस्थांनी शेतात जाऊन तपास केला असता वासुदेव चौधरी हे मृत अवस्थेत मिळुन आले. सदर घटना अंजाळे गावात माहिती पडताच परिसरात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची खबर त्यांचा पुतण्या सचिन पुंडलिक चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे. मयत वासुदेव चौधरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, सून, पुतणे व नातेवाईक असा परिवार आहे.

Exit mobile version