तुम्ही आंधळे असू शकता आम्ही नाही ; उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्ली उच्च न्यायालयानेही  आज  ऑक्सिजनच्या कमतरतेसंदर्भात सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला ढिसाळ कारभारासाठी  फटकारले  “देशात कोरोनाची जी परिस्थिती निर्माण झालीय त्याबद्दल तुम्ही आंधळेपणाचं नाटक करु शकता आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही,” असं न्यायालयाने म्हटलं आहे

 

देशामध्ये आरोग्य व्यवस्थांची कमतरता आहे. आजच देशातील रुग्णसंख्येने २ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मरण पावलेल्यांची संख्या २ लाखांच्या पुढे गेलीय. जगातील सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे. देशातील परिस्थिती दिवसोंदिवस चिंताजनक होत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे . “केंद्र सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली असून आम्ही असं करु शकत नाही”, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने ऑक्सिजन व्यवस्थापनासंदर्भातील संताप व्यक्त केला.

 

केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी भावनिक होण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यावर न्यायालयाने इथे लोकांचे प्राण पणाला लागले आहेत असं सांगताना हा भावनिक मुद्दाच असल्याचं सांगितलं. न्या. विपिन सांघी आणि न्या. रेखा पिल्लाई यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दिल्लीमधील परिस्थितीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.

 

ऑक्सिजनची कमतरता असल्याने दिल्लीमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती न्यायलयामध्ये देण्यात आली. न्यायालयाने ऑक्सिजन बँकसारखी पद्धत तयार करण्याचा सल्ला दिला. काही ठराविक ठिकाणी ऑक्सिजनचा साठा करुन तुटवडा जाणवू लागल्यास तिथून ऑक्सिजन पुरवठा करता येईल अशी यंत्रणा उभारण्यासंदर्भातील मत व्यक्त केलं. महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा वापर कमी होत असेल तर केंद्र ऑक्सिजनचे काही टँकर दिल्लीमध्ये पाठवू शकते. आम्ही आज सर्वोच्च न्यायालयासमोर आमचा अहवाल सादर करणार आहोत असं सांगत ७०० मेट्रीकटन गॅस द्यायची की नियोजित कोटा पूर्ण करायचा यासंदर्भात आम्ही भाष्य करणार नाही असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

Protected Content