जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ५९७ क्विंटल धान्याचे होणार मोफत वाटप

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी माहे जुलै ते नोव्हेंबर, २०२१ करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमाह ५ किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्यासाठी शासनाकडुन नियतन प्राप्त झालेले आहेत. 

या अन्नधान्यचे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना ६ लाख ५ हजार ५७१ सदस्यसंख्या व प्राधान्य कुटुंब योजना २१ लाख २६ हजार २८५ सदस्यसंख्या असे एकूण २७ लाख ३१ हजार ८५६ लाभार्थ्यांसाठी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ या परिमाणात  ८१ हजार ९५७ क्विं.गहू व ५४ हजार  ६४० क्विं. तांदूळ प्रतिमाह यांप्रमाणे १ लाख ३६ हजार  ५९७ क्विं. मासिक अन्नधान्य माहे जुलै २०२१ करिता मंजूर करण्यात आलेले आहेत. हे अन्नधान्य मोफत दराने वितरीत करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत पात्र स्थलांतरीत लाभार्थ्यांनी देखील प्रस्तुत योजनेचा एक देश, एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत पोर्टेबिलीटी सुविधेचा वापर करुन अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content