Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात विविध मागण्यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन!

चाळीसगाव, प्रतिनिधी| विविध प्रलंबित मागण्या ह्या तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन आजपासून पुकारण्यात आले आहे. याचे पडसाद चाळीसगाव येथील आगारात ही उमटले.

कोरोनाच्या काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. कडकडीत टाळेबंदीत कर्मचाऱ्यांनी परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करून दिला. असे असताना गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या प्रलंबीतच आहे. यामुळे विविध मागण्या ह्या राज्य सरकारने तातडीने पूर्ण कराव्यात यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून चाळीसगाव परीवहन महामंडळाच्या एस.टी. कर्मचाऱ्यांकडून बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनात विलिनीकरण, वार्षीक वेतनात ३ टक्के वाढ, घर भाडे मान्य केल्याप्रमाणे लागू करावे, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता २८ टक्के लागू करण्यात यावे, नियमानुसार अग्रीम रक्कम १२,५०० द्यावे व दिवाळीच्या अगोदर दिवाळी भत्ता १५,००० हजार रुपये आदी मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी संयुक्त कृती समितीचे विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले. याप्रसंगी कामगार संघटना सचिव विनोद पाटील, कामगार सेना सचिव सुनील जाधव, उदय सोनवणे, चालक विजय शर्मा, किशोर पाटील, मुस्ताक शेख, नितीन चव्हाण, सुरेश कुमावत, पप्पू कोळी व मोठ्या संख्येने एस.टी. कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version