घाम आणि रक्ताचे शिंपण करून अन्न देणाऱ्या शेतकऱ्याला मोदी सरकार रडवत आहे

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । आपला घाम आणि रक्ताचे शिंपण करून देशासाठी अन्न देणारा शेतकऱ्या मोदी सरकार रडवत आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आज देशातील शेतकरी आणि मजूर शेतीविरोधी तीन काळ्या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. कोरोना महासाथीच्या काळात देशातील प्रत्येक गरजवंतासाठी मोफत अन्नधान्य मिळायला हवे अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. मात्र ही मागणी शेतकरी बांधवांशिवाय पूर्ण होऊ शकते का, शेतकरी बांधवांशिवाय कोट्यवधी लोकांसाठी दोन वेळेच्या जेवणाची सोय करू शकतो का, असे सवालही सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

पंतप्रधान मोदी अन्नदात्या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी कायदे तयार केले, त्यांबाबत त्यांनी कोणाशीही सल्लामसलत केलेली नाही. शेतकऱ्यांच्या हिताकडे दर्लक्ष केले गेले आणि केवळ काही मित्रांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारे तीन काळे कायदे तयार करण्यात आले, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

 

संसदेत देखील हे कायदे तयार करताना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही. याच कारणामुळे शेतकरी आपले म्हणणे शांततेच्या मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी महात्मा गांधींच्या मार्गाने शेतकऱ्यांना रस्त्यावर येणे भाग पडले. मात्र, लोकशाही विरोधी सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले तर नाही, उलट त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

शेतकरी, मजूर आणि मेहनतीची कामे करणाऱ्यांची काळजी वाहणारे महात्मा गांधी यांची जयंती आहे. भारताचा आत्मा भारतील गावे आणि शेतामध्ये वसतो, असे गांधीजी नेहमीच म्हणत. आज जय जवान-जय किसान घोषणा देणाऱ्या आमचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

Protected Content