घसरत्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधी खवळले

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राहुल गांधी यांनी भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या आर्थिक स्थिरतेचा मुद्दा मांडत केंद्र सरकारवर प्रहार केला आहे. ‘भाजप सरकारची आणखी एक कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने देखील उत्तम प्रकारे कोविडची परिस्थिती हाताळली आहे.असे ते म्हणाले ‘

भारतातील घसरती अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात झालेली घसरण यावरून आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या वित्तीय वर्षात भारताच्या जीडीपी विकासात १० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज आहे. भारताचा विकासदर बांगलादेशच्या विकासदराहून कमी राहणार आहे. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी देखील जीडीपीसंदर्भात सरकारवर टीकास्त्र सोडले होते.

 

हे टीकास्त्र सोडत असताना राहुल गांधी यांनी आकडेवारीचा हवाला देत तक्ता देखील शेयर केला आहे. यात भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वित्तीय वर्षात अफगाणिस्तानच्या जीडीपीत ५ टक्के, तर पाकिस्तानच्या जीडीपीत .४० टक्के इतकी घसरण पाहायला मिळेल असे या तक्त्यात दाखवण्यात आले आहे.

या आठवड्यात आतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारत दक्षिण आशियात तिसरा सर्वात गरीब देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सध्या भारताच्या मागे फक्त पाकिस्तान आणि नेपाळ हे दोनच देश आहेत, असे एकूण जीडीपीच्या अनुमानावर नजर टाकली असता लक्षात येते. बांगलादेश, भुतान, श्रीलंका आणि मालदीव सारखे देश भारताच्या पुढे असणार आहेत. तथापि, सन २०२१ मध्ये ८.८ टक्क्यांच्या विकासदरासह भारत आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थेच्या रुपात पुनरागमन करू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे.

Protected Content