जळगाव, प्रतिनिधी । नवी मुंबई विमानतळाला हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोर सेनेतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणात मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुंबई शहराल आर्थिक राजधानी बनविण्यासाठी मेहनत घेतली. यासोबत त्यांनी राज्याला अन्नधान्याच्याबाबतीत समृद्ध केले आहे. शेतकऱ्यांना पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी यासाठी धरणे व विद्युत प्रकल्प उभारणीवर भर दिला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देवून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच जळगावातील गणेश कॉलनी येथील एचडीएफसी बँकेकडून सुभाषवाडी येथील बचत गटातील महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या महिलांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष सागर राठोड, जिल्हाध्यक्ष सुनील नाईक आदी उपस्थित होते.