Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गमावलेली चाळीसगाव विधानसभेची जागा पुन्हा मिळवा – जयंत पाटील

चाळीसगाव  प्रतिनिधी ।  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपला चाळीसगावमध्ये ४ हजार मतांनी पराभाव झाला . परंतु २०२४ सालात  परतफेड करा. महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांनी झपाट्याने काम करा ही जागा पुन्हा  निवडून यायलाच हवी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा तेराव्या दिवशी चाळीसगावमध्ये पोचली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे. या संवादाच्या माध्यमातून काही सुचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी ही संवाद यात्रा काढल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांची मोठी फळी इथे आहे. राजीव देशमुख यांच्या प्रती लोकांना खुप प्रेम आहे सहानुभूती आहे. कार्यकर्त्यांच्या सहानुभूतीचं रुपांतर मतांमध्ये करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. एकनाथराव  खडसे यांच्यासारखे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल याबाबत मनात शंका नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा, इथे जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव  खडसे यांनी व्यक्त केला. या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झालं ते विसरा आणि कामाला लागा असे सांगतानाच राजीवदादा तुझ्या पाठिशी आहोत असे आश्वासनही एकनाथराव  खडसे यांनी दिले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. जळगाव जिल्ह्यातही पक्ष एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचे आहे असा आत्मविश्वास एकनाथराव  खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी भाजपमधील खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 

Exit mobile version