Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार अरविंद सावंत यांना युनिसेफचा पुरस्कार

मुंबईः वृत्तसंस्था । ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना जाहीर झाला आहे.

भारतातील लहान मुलांचे जीवन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या खासदारांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो . शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा लोकसभेत ‘शिक्षणाचा हक्क’, ‘मुलांवरील अत्याचारांपासुन त्यांची सुरक्षा’ ‘कुपोषण आणि बाल आरोग्य’ या संदर्भात चर्चासत्रातील उल्लेखनीय सहभाग आणि लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न, या सर्वांचा विचार करून २०१८-१९ वर्षासाठी उपरोक्त पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षण क्षेत्रातील विषमता दूर करून समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते सतत आग्रही असतात. मुलांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. मोखाड्यात कुपोषित मुलांची बातमी येताच डॉक्टरांचे पथक घेऊन ते गेले आणि पुढे ४५० कुपोषित मुलांना दत्तक घेऊन ते सुदृढ होईपर्यंत त्यांना सकस आहार पुरवठा केला. शिक्षण आणि आरोग्य सेवेपासून वंचित मुलांसाठी अरविंद सावंत यांची तळमळ आणि धडपड गत अनेक वर्ष सर्वश्रुत आहे. २५-३० वर्षांपासुन ते ठाणे जिल्ह्यातील आदिवासींसोबत दिवाळी साजरी करतात.

कोकणातील शंकर महादेव विद्यालयात अनेक अमुलाग्र सुधारणा करून तेथे १९ वर्षे सातत्याने १०० टक्के निकाल आणून दाखवला. तेथील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवुन दिला. त्या शाळेतही नाशिकच्या आदिवासी मुलांना दत्तक घेऊन मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची व्यवस्था केली आहे.
अगदी तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राथमिक लशाळेतील गरीबांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित हे विषय प्रिं. वामनराव महाडिक यांच्या क्लासेसद्वारे शिवडी येथे विनामुल्य शिकवत. अरविंद सावंत यांनी २० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवशी मोखाड्यातील ११० अंगणवाड्यांना गॅस आणि शेगड्या दिले, तेही त्याकाळी गॅस व शेगड्या मिळणे दुरापास्त असताना.

नाशिकमधील पेठ, सुरगाणा असो, नंदुरबारमधील तोरणमाळ असो वा पालघर जिल्ह्यातील मोखाडा असो सावंत या तळागाळातील जनतेपर्यंत पोहचले, त्यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तेथील मुलांना, परिवारांना कपडे, धान्य पुरवणे, त्यांच्या सोबत दिवाळी, आरोग्य शिबीर, मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविणे हे उपक्रम कोणत्याही राजकीय लाभाचा विचार न करता केले.

Exit mobile version