Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी साहित्यातून होणारी जीएसटीची लूट थांबवा :- नाना पटोले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सरकारला जर शेतकर्‍यांना खरेच मदत करायची असेल तर त्यांनी कृषी साहित्यावरील जीएसटीतून होत असलेली शेतकर्‍यांची लूट थांबवावी, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकरी महासन्मान योजना ही फसवी आहे. महागाईमुळे शेती करणे परवडत नाही. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहेत. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार या वल्गना हवेत विरल्या आहेत. शेतकर्‍यांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल तीव्र संताप आहे. नुकसानभरपाई जाहीर करूनही ती अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही. भाजपाप्रणित शिंदे सरकार केवळ घोषणा करत आहे. शेतकर्‍यांकडून १०० रुपये लुटायचे आणि १ रुपयाची मदत द्यायची ही बनियावृत्ती आहे. निवडणुका डोळ्यासमोर असल्याने त्यांना शेतकर्‍यांची आठवण झाली आहे पण शेतकर्‍यांवर या तुटपुंज्या मदतीचा काहीही परिणाम होणार नाही.

नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकर्‍यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकर्‍यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत. खते, बि-बियाणे, शेती साहित्यावर जीएसटी लावून शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. सरकारला जर शेतकर्‍यांना खरेच मदत करायची असेल तर त्यांनी कृषी साहित्यावरील जीएसटीतून होत असलेली शेतकर्‍यांची लूट थांबवावी, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Exit mobile version