जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राज्य सरकारच्या मान्यतेनुसार एसटी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रियेची अंमलबजावणी जळगाव विभागात केली जात आहे. शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ कंपनीमार्फत भरती प्रकिया केली जाणार असल्याचे जळगाव एसटी विभाग प्रमुख भगवान जगनोर यांनी सांगितले.
जिल्ह्यासह राज्यात गेल्या ५ महिन्यापासून विलीनीकरणासह अन्य न्याय्य मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यात विलीनीकरण मुद्दा न्यायप्रविष्ट असून संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. कर्मचारी संपावर असल्याने परिवहन प्रशासनाकडून कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय घेण्यात आला. यात जळगाव विभागात ९५ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. यात सुरुवातीला ५० वाहन चालक कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहेत. तर नव्याने ४५ वाहन चालक कंत्राटी कर्मचारी भरती प्रकिया राबविली जाणार आहे.
खाजगी कंपनीकडून होणार प्रक्रिया
यशोधरा महिला औद्योगिक संस्थेमार्फत हि भरती प्रकिया केली जाणार आहे. परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांची समितीतर्फे या कंत्राटी कर्मचाऱ्याची वैद्यकीय, शारीरिक, दृष्टीदोष आदी तपासणीसह वाहन चालविण्याचे परीक्षण केले जाणार आहे. कंत्राटी वाहनचालक भरती प्रक्रियेसाठी १५० उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. या उमेदवारांना टप्याटप्याने मुलाखत, वाहन चालविण्याचा परवाना, शारीरिक क्षमता, दृस्तीदोष आदि तपासणी पूर्ण करून व वाहन चालविण्याचे परीक्षण करून अंतिम निवड केली जाणार असल्याचे विभाग प्रमुख जगनोर यांनी सांगितले.