Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उदयनराजे , संभाजीराजे , प्रकाश आंबेडकरांवर शिवसेनेची टीका

मुंबईः वृत्तसंस्था । ‘जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पहावेच लागेल,’ असं म्हणत शिवसेनेनं दोन्ही राजांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ‘जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही,’ असा खरमरीत टोलाही लगावला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या नाहीत तर आंदोलन व वेळ आल्यास तलवारी काढू, असा इशारा दिला होता. यावरुनच शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात भाष्य केलं आहे.

‘प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळंच काही चाललं आहे. कोल्हापूर व सातारचे राजे मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी हे विधान केलं. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालवण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्यानं बोलायला तयार नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो, यावर बोलायचे म्हटलं तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे,’ असा इशारा दिला आहे.

Exit mobile version