Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. मंगेश चव्हाणांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना मोफत भोजन

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील चैतन्य तांड्यात मोफत “मध्यान्ह भोजन योजने’चा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड यांच्या हस्ते रविवार रोजी करण्यात आले आहे. या योजनेतून बांधकाम कामगारांना दोन वेळेचे जेवण दिले जाणार आहे.

 

राज्य सरकारने बांधकाम कामगारांना सकस व पौष्टिक आहार मिळावा या उद्देशाने मोफत “मध्यान्ह भोजन योजने’ला नुकतीच सुरुवात केली आहे. दरम्यान या योजनेचा चाळीसगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांना लाभ मिळावा यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यानुसार चैतन्य तांडा ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच अनिता दिनकर राठोड यांच्या हस्ते रविवार रोजी शुभारंभ करण्यात आला. तर उपसरपंच आनंदा राठोड यांनी यावेळी ७५ लाभार्थ्यांना भोजन वाटप केला. या योजनेअंतर्गत सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा लाभार्थ्यांना भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. यात प्रामुख्याने भात, वरण, तीन पोळ्या, छोल्ले भटूरेची भाजी, गुळ व लोंच आदींचा समावेश आहे.

 

तत्पूर्वी तालुक्यात सुरुवातीला २ हजार कामगारांना हे मध्यान्ह भोजन पुरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी या “मध्यान्ह भोजन योजने’चा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

याप्रसंगी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्य भाऊलाल चव्हाण, वसंत राठोड, ग्रामस्थ मधुकर राठोड, जुलाल राठोड, उज्वल पवार, उज्वल राठोड व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version