जळगाव (प्रतिनिधी) हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मांडला होता. त्यामुळे आमचे उष्ट कोणी खाऊ नये, अशा कडवट शब्दात शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेवर टीका केली आहे. ते आज पहिल्या जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्यांनंतर जळगावात पत्रकारांशी संवाद साधत होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद येथे लावलेल्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. यावर आज पत्रकारांनी ना. पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी ही मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मांडली होती. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंबगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर म्हणूनच करीत आहे. म्हणून आमचे उष्टे कुणी खाऊ नये,असा टोला ना.पाटील यांनी मनसेला लगावला आहे. दरम्यान, राज ठाकरे औरंगाबाद शहरामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मनसेकडून पहिल्यांदाच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे.