Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर येथे मारहाणीत एकाचा मृत्यू; तिघांना अटक

अमळनेर प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना 31 डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनीत घडली. गुन्ह्यातील तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता शीतल मुकेश सैंदाने व कमल मुनिर फथरोड यांच्यात भांडण सुरू होते. एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी राजेश सिद्धी जाधव यांनी हे भांडण पाहिले, मात्र किरकोळ भांडण असल्याने मिटून जाईल म्हणून त्याने दुर्लक्ष केले. त्यांनतर सायंकाळी साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाने , मुकेश गोकुळ सैंदाने व भाग्यश्री उर्फ भुरी राजेंद्र पाटील या तिघांनी कमल फथरोड याला बोलावून घेतले आणि सायंकाळच्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या काठ्यानी कमलच्या छातीवर, डोक्यावर, कपाळावर व हातावर मारहाण केली त्यात रक्त सांडून कमल रस्त्यावर पडलेला होता. कमलचा मृत्यू झालेला होता घटनास्थळी शीतलच्या हातातील बांगड्या फुटून पडलेल्या होत्या.

म्हाडा कॉलनी टाकरखेडा रस्त्यावर शहराबाहेर 4 किमी अंतरावर असल्याने खून होऊन 2 तास उलटले तरी याबाबत भीतीने कोणीही वाच्यता करायला तयार नव्हते. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाल्यावर डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, व पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी शीतल, मुकेश व भाग्यश्री उर्फ भुरी यांचा शोध घेतला असता ते तिघे फरार झाल्याचे समजले तिघांनी पातोंडा येथे एका ठिकाणी आश्रय घेतल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथून तिघांना अटक केली असून तिघांविरुद्ध खुनाचा व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version